कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जींना त्यांच्याच गडात मात देण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहापर्यंत सर्वचजण मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडून ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदींवर बंदी का घातली नाही ? असा सवाल बॅनर्जी यांनी विचारला आहे.
हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांना एकत्रित मतदान करण्याचे आवाहन करणे ही चूक आहे का, प्रत्येक सभेत आपली खिल्ली उडविणाऱ्या मोदींवर बंदी का नाही ?, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही कोरोना आणलात आणि पळून गेलात. आम्ही सर्व काही ठीक केलं होतं. जर त्यांनी सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नसते, अशी जोरदार टीका देखील त्यांनी भाजपवर केली.
कोरोना सध्या कोणालाही कधीही होऊ शकतो. लोकांना योग्य उपचार मिळायला हवेत. पण गेल्यावेळी जेव्हा येथे कोरोना होता तेव्हा कोणी आलं नाही. आता मात्र सगळे निवडणुकीसाठी येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.