नवी दिल्ली – सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.
यावर गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असं म्हटलं होतं. यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. याच दरम्यान आता ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला आहे. चुरशीच्या लढतीत दिदींनी माजी सहकाऱ्याला पराभूत केले आहे.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे. पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या 1500 मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती.
भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला. टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. यानंतर अखेर नंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय झाला आहे.