मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील, अभ्यासक यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत.
विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करता कामा नये, असेही ते म्हणाले.