मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे., असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून, जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलामहाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावं. जर शोध लागत असेल तर त्यांची फेरयंत्रणा फार प्रभावी मानावी लागेल. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावर अन्नदाता येत असेल, तर त्याच्याशी नीट जावून बोलण्याऐवजी त्याला देशद्रोही, अतिरेकी, चिनी, पाकिस्तानी म्हणायचे. पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तानमधून शेतकरीदेखील आणायला लागले. आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानचं सर्टिफिकेट द्यायचं? असाच जर कारभार चालणार असेल तर हा तुघलकी कारभार सहन करणार नाही.
महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.