मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. २५ कंपन्यांमार्फत ६१ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक राज्यात होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अजबच संकेत दिले.
“काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं, तुम्ही मला 2021, 2022 आणि 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी कसं नाही म्हणणार?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“सरकार तीन पक्षाचं आहे. या सरकारमध्ये मती आणि गती आहे. मती, गती आणि प्रगती असं हे सरकार आहे. नवीन गोष्टी येत आहेत. सध्या राज्यात समाधानकारक परिस्थिती आहे. काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोना स्ट्रेन प्रकार आढळला आहे. तिथला स्ट्रेन वेगाने पसरत आहे. पुढच्या काही दिवसात त्याची घातकता किती आहे याविषयी माहिती मिळेल. लस आली तरीही मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं जरुरीचं आहे. हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“काम म्हणजे काम हे आपल्या अंगात भिनतं तेव्हा जी मॅगनेटिक ताकद आहे ती त्यामध्ये येते. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर घेऊन जाणं सोपं नाही. गुंतवणुकदाराचं महाराष्ट्रासोबत एक कौटुंबिक नातं निर्माण होतं. ते नातं मजबूत असतं. हे कुटुंब तुटू शकत नाही. माझ्या महाराष्ट्रातून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला