पुणे विभागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्यात मुंबईपेक्षाही अधिक रुग्ण पुणे विभागात वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे विभागाकडे लक्ष केंद्रित केले असून पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
“पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब. मुंबई-ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे. कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करताहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून हा कसोटीचा काळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.