मुंबई – औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसचा मात्र त्याला विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध असल्याचं म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”.
बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी जाहीर केली. ते म्हणाले की, “माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”. तसेच “छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया,” असंही ते म्हणाले आहेत.