मुंबई : मोदी सरकारने पावसाळी अधिवेशनात आणलेल्या कृषी विधेयक, कामगार विधेयकांना जोरदार विरोध पाहण्यास मिळत आहे. सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाला पंजाब, हरियाणासह देशभरातील शेतकरी विरोध करत असतानाच, आता कामगार विधेयकाला देखील विरोध होताना पाहण्यास मिळत आहे. कामगार विधेयकात 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपन्या सरकारची परवानगी न घेता कामगार कपात करू शकतात. या दुरुस्तीला प्रामुख्याने विरोध होताना पाहण्यास मिळत आहे.
यावरून आता काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईन यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून, अदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
हुसेन दलवाई म्हणाले की, 300 च्या आत कामगार संख्या असणारे उद्योग सरकारची परवानगी न घेता बंद करण्यास मुभा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कामगारांना उद्ध्वस्त करणारा असून त्यांना भांडवलदारांचे वेठबिगार बनविणारा आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज उद्योग बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत आहेत, अशा कठीण प्रसंगी कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. पण मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग खासगी भांडवलदारांना विकून कामागारांना बेरोजगार करत आहे. भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजप सरकार राबवत आहे. ब्रिटिशांनीही 1929 मध्ये काही कायदे करुन काही प्रमाणात कामगारांना संरक्षण दिले ते संरक्षण मोदी सरकारने काढून घेतले आहे. त्यामुळे भाजपा सरकारपेक्षा ब्रिटीश बरे होते असे म्हणण्याची वेळ कामगारांवर आली आहे, असेही हुसेन दलवाई म्हणाले.
अगोदर वाटतं होत की भाजपा च्या आडून आरएसएस वाले देश चालवत आहेत
पण शेतकरी बिल, नोटबंदी, मजूर बिल पहिल्या नंतर खात्री झाली की भाजपच्या आडून अदानी-अंबानी च देश चालवतायत
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) September 24, 2020
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील याच मुद्यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले की, अगोदर वाटतं होत की भाजपाच्या आडून आरएसएस वाले देश चालवत आहेत. पण शेतकरी बिल, नोटबंदी, मजूर बिल पहिल्या नंतर खात्री झाली की भाजपच्या आडून अदानी-अंबानीच देश चालवत आहेत.