मुंबई : देशात नरेंद्र मोदी आणि भाजपची सत्ता येऊन आज ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला जात असून, मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने सुरु आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी नैतिक जाबाबदारी स्वीकारून राजीनामा दयावा, अशी मागणी देखील काँग्रेसकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लबोल केला. “पंतप्रधान हे विकासाचा नाही तर विखाराचा राष्ट्रीय अजेंडा राबवत आहेत. मोदी व अमित शहांचा कारभार हा संपूर्णपणे दडपशाहीचा आहे. त्यांनी याच पद्धतीने जम्मू-काश्मीरमधले कलम ३७० रद्द केले आणि हिंदू-मुस्लिम वाद उभा केला,” अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.
“पंतप्रधानांनी पुलावामतील शहिद जवानांच्या बलिदानाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला. तिकडे गलवान खोऱ्यात २० जवानांचा बळी गेल्यावरही पंतप्रधान हे चुप्प राहिले. आत्तापर्यंतच्या देशाच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती. मोदींच्या अहंकाराला आता कोणतीही सीमा राहिलेली नाही. त्यांनी तीन काळे कायदे शेतकऱ्यांविरोधात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरले. एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघायचा; मात्र, आत्ममग्न प्रधानमंत्र्यांनी ‘नव्या भारताचा पाया’ स्मशानातील चितांचा धूर आणि गंगेत वाहणाऱ्या प्रेतांनी रचला” अशी जळजळीत टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
तसेच, “मोदी सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला गेली. महामारीपूर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर निच्चांकी होता. मात्र, आता तो रसातळाला पोहोचला आहे. भारताचे दरडोई उत्पन्नदेखील बांगलादेशपेक्षा कमी आहे. आत्मनिर्भरतेचे नाव देऊन मोदींनी कित्येक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करुन देशाची वाट लावली. सध्याच्या काळात देखील मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या वास्तवात त्या सगळ्या फसव्या निघाल्या,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
आज राज्यातल्या प्रत्येक विभागात, काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन, मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली.