राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यास चार दिवस शिल्लक असताना, माजी उपमुख्यमंत्री व गेहलोत सरकारविरुद्ध उभे ठाकलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड मागे घेतले असून, त्यांची वापसीची तयारी सुरू झाली आहे.मात्र सचिन पायलट यांचं बंड मागे घेण्यामागे राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे खासदार राजीव सातव यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.
राजीव सातव यांनी बजावली महत्वाची भूमिका
एक तास चाललेल्या चर्चेअंती सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत आणि अधिवेशनाला हजर राहून अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा देतील, हे स्पष्ट झाले.राजीव सातव सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. हायकमांड आणि सचिन पायलट यांच्यातील ते मोठा दुवा ठरले, असं सांगितलं जातंय. सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे याआधी देखील राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
मध्यस्थीसाठी समिती स्थापन
अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात प्रत्यक्ष समझोता घडवून आणण्यात येणार असून, त्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यातील नेते या दोघांशी स्वतंत्रपणे व दोघांना एकत्र घेऊन चर्चा करणार आहेत. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर अन्याय होऊ नये, त्यांना पक्षात मान दिला जावा आणि यापुढे त्यांच्यावर पक्षद्रोही असा शिक्का मारला जाऊ नये, यासाठी दोघा नेत्यांत समझोता घडवून आणणे, ही या समितीची जबाबदारी असेल.