मुंबई – देश जवळपास गेल्या वर्षभरपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. देशात तब्बल १ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ९५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. तर जवळपास दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेचं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका आणि प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.