पुणे – नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.
औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच गोंधळ सुरू आहे. यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. याव्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून सोडवतील, असं म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली.