कराड : शरद पवार आमच्या सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले. ते 105 लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, असंही अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99 च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराडला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (