कोरोनाच्या स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडवकडून औषधे घेतो, असे वक्तव्य केले होते. डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळते, मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो. डब्ल्यूएचओला काय कळते, सीबीआयसारखेच आहे ते, इकडून तिकडून माणसे गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला, अशा प्रकारची वक्तव्य राऊत यांनी त्या कार्यक्रमात केल्यानंतर, राज्यातील डॉक्टर वर्गात मोठी नाराजी पसरली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शीवाय ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.