मुंबई : सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर करोनामुळे परिस्थती हाताबाहेर गेली आहे. प्रत्येक दिवसाला देशात दोन लाखांच्याहून अधिक करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. तसेच देशात सगळीकडेच बेड्स, ऑक्सिजन सोबतच रेमेडीसीवर या करोना रोगावर गुणकारी असणाऱ्या इंजेक्शन्सचा देखील तुटवडा असून, यावरून महाराष्ट्रात देखील राजकारण चांगलचं तापलेलं आहे.
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या, मला जर करोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप अनेक नेत्यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
दरम्यान, आता फडणवीसांनी देखील संजय गायकवाडांवर पलटवार केला असून, कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे करोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं, असा खोचक टोला लगावला आहे.
तसेच, मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला करोनाच्या विषाणूने फार काही होईल असं वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना करोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना असं काही करायची इच्छा असेल, तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात देखील गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत.