पंढरपूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार पडणार असल्याची वक्तव्य केली जात आहेत. भाजपच्या नेत्यांनी अगदी वेळ, तारीख देखील अनेकदा जाहीर केली. मात्र आता थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिल्याने एका नव्याच चर्चेला आता उधाण आले आहे.
‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेली, म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली असून, भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.