मुंबई : देशात दिवसाला सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या तब्ब्ल २ लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा तुटवडा जाणवत असून, परिणामी करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा, रुग्णवाहिकांचा, ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.
दरम्यान, एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली असून, अनेक सवाल त्यांनी सरकारला विचारले आहेत. तसेच देशाची सामान्य जनता देखील यावरून समाज माध्यामांवर संतप्तपणे व्यक्त होत असून, देशात हा एवढा मोठा विरोधाभास असूनही या लाखो भाविकांवर कारवाई का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जात आहे.
यातच आता कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे सहाजिकच हजारो जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रामध्येही काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे.
दरम्यान, कुंभमेळ्याहून महाराष्ट्रात खासकरून मुंबईत परतणाऱ्या भाविकांना,आपल्या घरी पोहोचण्यासाठी अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे, कारण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या भाविकांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती दिली आहे. कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परत आल्यावर करोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा महत्त्वाचा संकेत दिला आहे.
Those returning from Kumbh Mela to their respective states will distribute Corona as 'prasad'. All these people should be quarantined in their respective states at their own cost. In Mumbai also, we're thinking of putting them under quarantine on their return: Mumbai mayor pic.twitter.com/5J8lzUmw2E
— ANI (@ANI) April 17, 2021
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याहून परतणारे भाविक ‘प्रसाद’ म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मात्र, जे भाविक मुंबईत परततील, त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत.
राज्यात हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.