मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांचा आकडा उच्चांक गाठत आहे. या करोना साथीच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी, सरकारने राज्यात पाच एप्रिलपासून नवे करोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना, केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याबाबत देखील समाधान व्यक्त केले होते.
दुसरीकडे राज्यातील सरकारमधील नेतेमंडळी मात्र, केंद्राकडून लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे वक्तव्य सातत्याने करताना पहायला मिळत आहेत. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, करोनाच्या लसीकरणासंदर्भात पत्रकार परिषदे घेतली, यात त्यांनी लसीकरणा संदर्भात महत्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी, करोनाच्या लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अव्वल असला, तरी हवा तसा पुरवठा केंद्राकडून केला जात नसल्याचं सांगत, इतर मंत्र्यांनीच ‘री’ ओढली.
यावेळी त्यांनी, राज्यात लसीकरणाची केंद्रं वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच; पण नागरिकांनीही पुढाकार घेऊन लस टोचून घेतली पाहिले, असं सांगत नागरिकांना लस टोचवून घेण्याचं आवाहन केलं आहे. टोपे यांनी लसीकरणासंदर्भातील अफवा आणि गैरसमजुतींवरही यावेळी भाष्य केलं. “लसीकरण करुन घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. करोनाला थोपविण्यासाठी लस टोचून घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे लसीकरणाबाबतीत कोणत्याही गैरसमजुतींना बळी पडण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले.
तसेच आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणात मुस्लीम समाजाचं प्रमाण अत्यंत कमी असून, लसीकरणाबाबत जागृती करण्यासंदर्भात अबू आझमी आणि इतर मुस्लीम आमदारांशी, तसेच मुस्लीम समाजाचे अनेक मौलवी आणि धर्मगुरूंशी देखील चर्चा करणार असल्याचं सांगितलं. समाजातील सर्व घटकांनी लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहनही त्यांनी सर्वधर्मीय नागरिकांना यावेळी केलं.