अहमदनगर : स्थानिक कार्यकर्त्यांच्या चुकीच्या माहितीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी लसीकरण प्रक्रियेवर बोट ठेवून माझ्यावर केले. परंतू, या आरोपांत कुठलेही तथ्य नसून ही दुर्दैवी बाब आहे. कोरोना प्रादुर्भावात राजकारण नको होते. कोरोनाची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करून, मला ज्ञान शिकवताना भान ठेवणे अपेक्षित होते, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टीका केली आहे. ते काल मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री तनपुरे म्हणाले, ‘कोरोना लस पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. परंतू, केंद्राच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरण रेंगाळले, हे अपयश आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसी मिळत आहेत. खासदार विखेंनी माझ्यावर आरोप करीत वेळ घालविण्यापेक्षा पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटून जास्त लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते’, असे त्यांनी बोलतांना सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, केंद्राच्या कोविड ऍपवर ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यांवर नागरिक नोंदणी करू शकत नाहीत. राहुरी तालुक्याबाहेरील नागरिकांनी नोंदणी करून लस घेतली. लसीकरणाचा फज्जा उडाला. वाड्यावर बसून लसीकरण प्रक्रिया राबविली नाही. शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लसीकरण प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. त्यांना निर्देश देणे म्हणजे दबाव टाकणे नाही. केंद्राच्या निधीच्या व्याजातून जिल्ह्यात रुग्णवाहिका खरेदी केल्या. व्याजाची रक्कम खर्च करण्याचा राज्याला अधिकार आहे. तालुक्यातील पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण शासनाचा प्रतिनिधी म्हणून केले. त्यापूर्वी कोणी लोकार्पण केले, यावर माझा आक्षेप नव्हता. लसीकरणापूर्वी कोरोना चाचणी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी लस घेतली तर दुष्परिणाम होतात. चाचण्या वाढवायच्या होत्या, एवढाच त्यामागे उद्देश आहे,” असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.