औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे.
हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यावरून देशात राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं उत्तर प्रदेश व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आंदोलनाची हाक दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र या संदर्भात काहीशी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
औरंगाबाद येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यासोबत खरोखरच काही चुकीचं वर्तन झालं असेल तर प्रशासन त्याची नक्कीच गंभीर दखल घेईल. कुठल्याही नेत्याला अशाप्रकारे धक्काबुक्की होणं योग्य नाही. पण तसं काही झालं आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी यांना नेमकं ढकलून दिलंय की ते पडलेत हा विषय संशोधनाचा आहे. तो तपासला जाईल,’ असं दरेकर म्हणाले.
हाथरसच्या घटनेवरून योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला. ‘हाथरसची घटना दुर्दैवीच आहे. आम्हीही या घटनेचा निषेध केलाय. मात्र, विरोधक यात राजकारण करत आहेत. पुण्यात एका तरुणीला ठेचून डोंगरात टाकून दिलं. रोह्याला १४ ते १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला दरीत ढकलून दिलं. पनवेलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला.
नुकताच एका डॉक्टरनं क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग केला. यातल्या कुठल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला?,’ असा प्रश्नही त्यांनी केला. ‘आपल्या पायाखाली काय जळतंय बघा. महाराष्ट्रात रोज काही ना काही होतंय. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. राजीनामेच मागायचे झाले तर तुमचे रोज राजीनामे मागावे लागतील. हाथरसच्या विषयावर राजकारण करण्याची संधी यांना मिळालीय. ती त्यांनी साधली आहे आणि आम्हाला सांगतात राजकारण करू नका. हाथरसच्या घटनेवर बोलणारे संजय राऊत महाराष्ट्रातील घटनांवर का बोलले नाहीत? गृहमंत्र्यांनी एखाद्या ठिकाणी भेट दिली नाही?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली.
दरम्यान या घटनेचा खासदार शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, असादुद्दीन ओवैसी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून निषेध करत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांना धारेवर धरले आहे.