अमरावती : एकनाथ खडसे यांनी काल भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. खडसेंच्या जाण्याने पक्षाला कोणतेही नुकसान होणार नसल्याचे भाजपचे नेते म्हणत आहे. यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खडसे गेल्याने भाजपला मोठे नुकसान झाले असून, यामुळे राष्ट्रवादीला फायदा होईल, असे मत व्यक्त केले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील. सोबतच त्यांनी खडसेंना राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.