मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची मुंबईतून थेट आता गोंदियात बदली करण्यात आली आहे. . दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियाच्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात विविध कारणांमुळे महाराष्ट्र पोलीस खाते चर्चेत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या, सचिन वाझे प्रकरण त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दया नायक यांच्या या तडकाफडकी बदलीने आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
दया नायक यांनी गेल्या वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मुख्य म्हणजे मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमचे नेतृत्व दया नायक करत होते.
दरम्यान, दया नायक हे एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 80 पेक्षा अधिक एन्काउंटर केल्याचे देखील सांगितले जाते. बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याचे देखील आरोप करण्यात आले होते.