अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी सर्वच नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना दिलासा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दौंड-बारामती भागात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील शेवटच्या स्वामी चिंचोली या गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. या गावात जाणारा डांबरी रस्ता आणि पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यासाठी त्यांनी चालत जाऊन चिखल-गाळ तुडवत ओढा पार करुन गावकऱ्यांशी संवाद साधला.
फडणवीस हे ओढ्याच्या पलिकडे असल्याने, आपली व्यथा मांडण्यासाठी गावातील पोपट मुलाणी हे पोहत पोहत त्यांच्यापर्यंत पोहोचले. पाण्यातूनच त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी फडणवीसांनी पत्रकारणशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या व्यथा ठाकरे सरकार समोर मांडल्या आणि सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावंस अशी विनंती करत खोचक टोला देखील लगावला.
फडणवीस म्हणाले,”मागील आठ दिवसांपासून या नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही. विजेचे खांब वाहून गेल्याने या भागात वीज नाही. सरकारने कोणत्याही मदतीआधी या लोकांपर्यंत पोहोचणंच गरजेचं आहे. ऊसाची शेती पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. आद्यपही अधिकारी या ठिकाणी पोचले नाहीत. पंचनामे झाले नाहीत. पंचनाम्याची गरज नाही. लोकांशी संपर्क करणे जास्त गरजेचे आहे. शेतीचं १०० टक्के नुकसान झालं. शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांकडे अन्नधान्य आहे. मात्र वीज गेल्याने दळण होत नाही. सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी.” असा टोला त्यानी सरकारला लगावला