मुंबई : राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना देखील रस्तावर गर्दी करणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणे, या कलमांतर्गत लासलगाव पोलिसांनी सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सदाभाऊ खोत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात कांद्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे आक्रमक आंदोलन सुरू झालं आहे. देशाच्या सीमेवर रोखलेले सर्व कांद्याचे कंटेनर त्वरीत परदेशात पाठवा नाहीतर एकही केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्याला फिरू देणार नाही, असा थेट इशारा या आंदोलकांनी दिला आहे.
कांदा निर्यातबंदी निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय असल्याचं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. निर्यातबंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.