नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. काल दुपारी जवळपास 3 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली तसेच पाच मुले असा मोठा आप्त परिवार आहे.
मा. गो. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. आपल्या परखड मतांसाठी ओळखले जाणारे मा. गो. वैद्य हे संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून सुरुवातीला काम करत असे. त्यानंतर त्यांनी संघासाठी पुर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कोरोनातून देखील बरे झाले होते. काल दुपारी त्यांना हृदय विकाराचा धक्का बसल्याने त्यांना स्पंदन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करणयात आले.
मा. गो. वैद्य 1943 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1978 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे देखील सदस्य होते.
संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 19, 2020
मा. गो वैद्य यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते, असे ट्विट त्यांनी केले.