मुंबई : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात सर्वाधिक चर्चा भाजपने सत्ता आल्यास बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, या आश्वासनाची होत आहे. आता यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना करोनावरील लस देणार नाही का?, असा सवाल थोरात यांनी भाजपला विचारला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बिहार निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे. यावरून विरोधक भाजपवर टीका करत आहे.
थोरात म्हणाले की, कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे.
महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का?, असा सवाल देखील केला.