आज सकाळी रायगड पोलिसांची टीम अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी आली होती. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर आता राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सवाल उपस्थित केला आहे.
“तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का? ” असा सवाल राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडे गृहखातं असूनही अर्णव गोस्वामी यांच्या अकटेवर राष्ट्रवादी काहीही बोलताना दिसत नाही; असे म्हणत राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“राज्यात सध्या लोकशाहीची गळचेपी सुरु आहे. सरकारच्या बाजूने बोललं तर ठीक अन्यथा घरातून खेचून नेणार हे योग्य नाही. राज्यात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती आहे.” असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच, देशात भाजपच्या लोकांबद्दलही बोललं जातं, त्यांच्यावरही टीका होते. पण आम्ही असं वागत नाही. राज्यात गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, राष्ट्रवादी यावर काहीही बोलताना दिसत नाही. राष्ट्रवादीची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप महाजन यांनी केला.