नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मंदिरं बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता. आता या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले असून, राज्यपालांनी पत्रात लिहलेले काही शब्द टाळायला पाहिजे होते असे ते म्हणाले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिक चांगल्या शब्दांचा वापर करायला पाहिजे होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र मी वाचले आहे. या पत्रात कोश्यारी यांनी काही संदर्भ दिले आहेत. कोश्यारी यांनी शब्द जरा जपून वापरायला हवे होते. त्यांच्या शब्दांची निवड चुकली, अशी सूचक टिप्पणी अमित शाह यांनी केली.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी मंदिरं बंद असण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले होते.