प्रतिनिधी / ओंकार गोरे
पुणे : जागतिक कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लोटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाच राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नियम पायदळी तुडवत कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या गर्दीत विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला होतो. या गोष्टीला सरकारकडून दुजोरा मिळतो तोच शिवसेनेच्या नेत्यांनी अत्यंत निंदनीय प्रकार घडवून आणला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार चक्क कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. संचारबंदीत विकासकामांचे भूमिपूजनाला अमाप गर्दी जमवणे, पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कामगार यादीत करणे, परंतु मुख्यमंत्री यावर एकही शब्द बोलायला तयार नाहीत, यावरून शिवसेनेचा मनमानी कारभार सुरू झालाय का?, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.
औरंगाबाद- बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. साजेगाव हे गाव राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे स्वतः चे गाव आहे. शिवाय ज्या जिल्हा परिषद प्रशासना मार्फत या कामाची निविदा पास करण्यात आली होती, त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी संदीपान भुमरे यांच्या चिरंजीवाची वर्णी लागली आहे. अर्थात काय तर मंत्री भुमरे आणि त्यांचे चिरंजीव यांच्या अधिपत्याखाली या कामाचे नियोजन आखण्यात आले होते. यायचा फायदा उचलत केवळ पैसे उकळण्याच्या उद्देशाने शिवसेना नेत्यांनी कामगारांची बोगस नाव दाखवत हा निंदनीय प्रकार घडवून आणला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून घोटाळ्याची पोलखोल
औरंगाबाद- बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम कामगारांनी नव्हे तर जीसीपी आणि पोकलेनेच्या साह्याने करण्यात आले आहे. मात्र कागदोपत्री बोगस नाव दाखवण्यात आले आहे. एवढच नाही तर, रस्त्याच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी करत या प्रकरणाची पोलखोल केली आहे.
कुंपनच शेत खायला लागलं तर अपेक्षा कोणाकडे?
एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदीत कोणी घराबाहेर पडू नका, गर्दी जमवू नका, अशी वारंवार विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून करण्यात येत होती. मात्र , मंत्री संदीपान भुमरे यांनी नियम पायदळी तुडवत कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या गर्दीत विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला होतो. परंतु यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ठाकरे सरकारकडून करण्यात आली नाही.
तर, दुसरीकडे औरंगाबाद- बीड हायवे ते साजेगाव रोड या रस्त्याच्या कामासाठी दाखवण्यात आलेले कामगार चक्क कोविड पॉझिटिव्ह आहे. या प्रकरणी मंत्री भुमरे यांना विचारले असता, हे प्रकरण मला आत्ताच कळाले आहे, त्यामुळे संबंधित प्रकरणाची माहिती घेत आहे. जर यात कुणी दोषी आढळत असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. मी किंवा आमचं सरकार कधीच भ्रष्टाचारसारखे गोष्टींचा समर्थन करणार नाही, असे सांगत भूमरेंनी सरळ हात वर केले आहे. शिवसेनेच्या या मनमानी कारभारामुळे “कुंपनच शेत खायला लागलं तर अपेक्षा कोणाकडे करायची?”, याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही.