कोल्हापुर: कोल्हापुर जिल्हा दूध संघ गोकुळ Kolhapur District Milk Association Gokul Election निवडणुकीच्या निम्मिताने राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्तारुढ पॅनेल 400 ते 500 मतांनी विजयी होणार असल्याचेही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यांनतर सत्तारूड गटातील उमेदवार प्रताप पाटील कावणेकर यांनी विरोधी गटाच्या विरोधात एक पत्रक प्रसिद्ध केले आणि त्यात सतेज पाटलांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. कोरोनामुळे राज्यातील 45 हजार संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या ; पण विरोधी आघाडीतील मंत्र्यांनी गोकुळच्या सभासदांना या संकटात ढकलून निवडणुकीचा अट्टहास केला आहे. पालकमंत्र्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील ठरावदारांचा मृत्यू झाला असे पत्रकात म्हटले गेले आहे.
दूध उत्पादकांना कोरोनाची लागण होऊ दे किंवा त्यांचा जीव जाऊ दे, पण आम्ही सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरणार हेच गोकुळ’च्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. आजवर गोकुळमध्ये फक्त आणि फक्त शेतकरी हिताचाच कारभार झाला आहे. त्यामुळे संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार ही पालकमंत्र्यांची वलाना थापेबाजी, ज्यांना उत्पादकांच्या जीवाशी खेळताना काही वाटत नाही, ते कसले पालक, त्यांचे उत्पादकांबद्दलचे प्रेम पुतणामावशीचे असल्याची टीका सत्तारुढ आघाडीचे उमेदवार प्रताप पाटील – कावणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील लाखो उत्पादकांच्या पाठिंब्याने आणि इतक्या वर्षाच्या तपश्चर्येतून निर्माण झालेल्या गोकुळ ला काही जण राजकीय अड्डा बनवू पाहत आहेत. विश्वास आणि अनुभव नसलेल्या माणसांच्या हातात सायकलसुद्धा चालवायला आपण देत नाही, ज्यांचे काम संस्था बंद पाडणे एवढेच आहे अशा धूर्त आणि पाताळयंत्री लोकांच्या हातात दूध उत्पादकांचे भविष्य देणे चुकीचे आहे, असे पत्रक संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी प्रसिद्धीला दिले आहे. पत्रकात म्हटले आहे. आज विरोधकांकडून खोटे – नाटे आरोप करत भ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा टोला देखील त्यांनी लावला आहे.