औरंगाबाद – कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद होण्याची शक्यता आहे. कारण हर्षवर्धन जाधव ऐवजी त्यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी ग्रामपंतायतींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये संजना जाधव यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत आहोत, असं सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी आपली पत्नी पुढील राजकारण पाहिल, असं म्हटलं होतं.
संजना जाधव यांनी पिशोर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला पॅनल उभा केला आहे. पिशोर गाव हे संजना आणि हर्षवर्धन जाधव यांचं मूळ गाव आहे. पिशोर गावासह संजना जाधव या कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्येही पॅनल उतरवणार असल्याचं कळतंय. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे ग्रामपंचायत निवडणुकीतून बाद झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर संजना जाधव यांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री होताना दिसत आहे.