कोल्हापूर – कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी व दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचेमं त्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले
हसन मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत ते म्हणाले, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत.’
दरम्यान, कृषी कायदा रद्द करण्यास विरोध करून भाजप हा शेतकरी हिताविरुद्ध आहे हे चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केले आहे, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मारला.