राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगल आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असतात. चंद्रकांत पाटील मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत म्हणाले होते की, राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे बोलण्याआधी मुश्रीफ वक्तव्य करतात. त्यांची ही कृती म्हणजे “आ बैल मुझे मार” शरद पवारांप्रती निष्ठा दाखवण्याची त्यांची केविलवाणी धडपड असते. या टीकेला आता मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे.
मुश्रीफ म्हणाले की, निष्ठा दाखवण्यासाठी मला केविलवाणी धडपड करावी लागते, ही टीका हास्यास्पद आहे. कारण कितीही संकटे आली, मला भाजपमध्ये घेऊन मंत्री केले की, प्रचंड माया दिली त्यावेळीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे.
सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेबाबत ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारे विधान कधीच केले नव्हते. पहिल्यांदा माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी केली.