मुंबई : ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने जो कारभार केला आहे, त्यात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने कोरोनाकाळात, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, तसेच कंगना राणावत प्रकरणात महाराष्ट्र राज्याचा अवमान केला, त्याला चोख उत्तर या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदानातून मिळाले आहे. त्यामुळे ‘पदवीधर’मध्ये ही अवस्था तर सर्वसामान्यांमध्ये काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी,’ असे खडे बोल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या एका वर्षात महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी जनता आतुर झाली आहे, अशी द्वेषपूर्ण वक्तव्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, आजच्या निकालाने भाजपला चांगलीच चपराक बसली आहे.
चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे 12 वर्षे प्रतिनिधित्व करत होते, तर 55 वर्षे नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. संभाजीनगर मतदारसंघात तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने हॅट्ट्रिक केली आहे. हे मतदारसंघ सुशिक्षित असून, यासाठी पदवीधर मतदान करतात. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. आमच्यातील एखाद-दुसरा आमदार फोडून पोटनिवडणूक झाली, तर त्यांचे डिपॉझिटही राहणार नाही.