केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकाविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. संसदेत केंद्र सरकारने आणलेले तीन कृषि विधयके रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून कोणताही निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
महाविकास आघाडीचा या बंदला पाठिंबा असल्याचे सांगत राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. तसेच, शांततेत हा बंद पार पाडण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर कोणताही बदल केंद्र सरकारच्या कृषि विधेयक होणार नसल्याचे सांगणारे चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करत ते मुद्दाम आगीत तेल ओतत असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.
याचबरोबर, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.