मुंबई : भाजपचे उमेदवार पदवीधरांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आता सांगत आहेत. मग त्यांचे नेते चंद्रकांत पाटील सहा वर्षे आमदार-मंत्री असताना झोपले होते का?’ असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी असून, त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती संयमाने सांभाळली. मुंबईसह महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या कामाचे जगाने कौतुक केले, पण मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून भाजपने वैचारिक दिवाळखोरी दाखविली. मंदिरे उघडून लोक मरू देत आणि सरकार पडू दे, असा डाव त्यामागे होता.
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड व शिक्षक उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ इंगळे सभागृहात मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, दादासाहेब लाड, पंचायत समिती सभापती कविता चौगुले, खंडेराव जगदाळे, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, मंगल चव्हाण आदी उपस्थित होते.