मुंबई : एकीकडे कोरोनारुग्णांची वाढती संख्या, तर दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा अशा दुहेरी संकटाचा सामना राज्य सरकार गेली काही दिवसांपासून करत आहे. इतर राज्यांतून देखील महाराष्ट्रात ऑक्सिजन आणला जात आहे. आता ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे.
आतापर्यंत सुमारे 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 6, 2021
ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे 350 प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे 500 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले.
राज्यात कार्यान्वित झालेले हे 38 पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत. वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत.