मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याशिवाय सुटकेची मागणी करत आंदोलनही करण्यात आलं. त्याचाच वचपा काढत ईडीच्या माध्यमातून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकल्याचा आरोप केला जात आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अर्णब गोस्वामी आणि भाजपाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
“अर्णब गोस्वामी यांच्यासारखे अनेक चॅनेल आहेत. ते काही आमच्याबद्दल बोलत नाहीत का? माझ्यावर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत नाही का? पण एखादं चॅनेल तुमच्यावर टीका करतं म्हणून ते आमचं होतं का? आमचा अर्णब गोस्वामींशी काही संबध नाही. यांनी केलेली कारस्थानं आपोआप उघड होऊ लागली आहेत,” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
जेवढ्या ईडीच्या कारवाया आमच्यावर झाल्या आहेत तेवढ्या कोणावर झालेल्या नाहीत. हात बरटलेले नसतील तर घाबरायचं कारण नाही. काहीच नसेल तर ईडी आणि सीडीला घाबरता का? मन साफ असंल तर काहीही होऊ द्या. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.
राज्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?”. शरद पवारांनी ज्योतिषी उल्लेख केल्याच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही”.
Read Also :
‘अडचणीत आणाल तर आम्ही आणखी बळकट होऊ’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं भाजपला प्रत्युत्तर
लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत मनसेची शिवसेनेवर खोचक टीका
‘वर्षभरापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडी सरकार आलं आणि टिकलं’