पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरी गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टिका केली. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला चांगलचं सुनावलं. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलंय.
यावेळी मोहोळ म्हणाले की, सुप्रियाताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण मी ताईंना आठवण करून देतो की, जेव्हा त्यांची राज्यात आणि देशात सत्ता होती. तेव्हा त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. शेतकऱ्यांचा जीव घेतला होता. तसं तरी आम्ही काहीही केलेलं नाही. बोलायला गेलो तर खुप काही निघेल. परंतु आम्ही वैयक्तिक बोलत नाही. असे मोहोळांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांनी देखील यावरून टिका केली. शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री अजित पवार होते. त्यामुळे मोहोळ यांनी अजितदादांना प्रश्न विचारावा यावरून पुण्यातील दोन्ही उमेदवार आमनेसामने आलेत.
दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपकडून राज्यघटना बदलण्याचे काम सुरू असल्याचे टीका केली होती. सुळे यांच्या टीकेचा देखील मुरलीधर मोहोळ यांनी समाचार घेतला.
“संविधान बदलण्याची विरोधकांची टीका ही धादांत खोटी असून ते केवळ खोटं बोलण्याचा काम करत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केलं. इंदू मिल स्मारक असो की लंडनमधील घर हे आमच्या सरकारने केलं आहे. विरोधकांनी राजकारण सरळ करावं, खोटं बोलून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये” अशी टीका मोहोळ यांनी केलीय.