लोणावळा: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यावरून आता या समाजात अस्वस्थता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोणावळा येथे काल व आज दोन दिवस ओबीसी चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. तर या मुद्द्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुडे म्हणल्या की, ओबीसींना या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत. कोणत्याही आरोपाचं, टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना न्याय मिळत असेल तर आमची तयारी आहे. पाच जिल्हा परिषदेच्या निवडणूका व्हायला नको, हा निर्णय इथे घ्यायचा आहे. ओबीसींविना या निवडणूका झाल्या तर पुढील निवडणूका अशाच होतील. तीन महिन्यात इम्पेरीकल डेटा गोळा करुन ओबीसींचं आरक्षण संरक्षित करायचं आहे. आजची लढाई निर्णय आणि निश्चयाची आहे. आज निर्णय करण्याची गरज आहे,. ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होणार नाही, हा निश्चय आज करायचा आहे. सरकारला इम्पेरिकल डेटा तयार करून तो कोर्टात सबमिट करायचा आहे. आम्ही याबाबतीत सरकार सोबत आहोत.
विजय वडेट्टीवारांनी, महामारीची लाट ओसरल्यावर, ओबीसी समाजाचा पहिला विराट मोर्चा औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा केली. “जेवढे पैसे ‘सारथी’ला मिळतील तेवढेच पैसे ‘महाज्योती’लाही मिळतील, मी बसलोय इथे,” असे सांगत, “आमच्या खात्यात पैसे आले, तर आम्ही ते परत जाऊ देणार नाही,” असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
“राज्यभरात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. ‘सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिए’. मला ओबीसींची खातं मिळालं, तेव्हा साधा चपराशीही नव्हता. उधारीवर आणि समाज कल्याण विभागाच्या भरवशावर मी हे खातं चालवतो आहे. मग काही दिवस रुसलो, मग वाटलं चूक झाली. विरोधी पक्षनेता होतो, ओबीसींची नेतृत्व करत होतो. वाटलं होतं, महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटलं. मी ओबीसी आहे ना, मग महसूल खातं का मिळेल? मागच्या सरकारमध्ये पंकजाताईंनाही ग्रामविकास खातंच मिळालं होतं,” या शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.