जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेताच्या बांधावर गेल्याने विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधवार जाणार नाहीत तर काय बंगल्यात बसून राहतील काय?, असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला आहे.
आधी कर्जमाफीचा हिशोब द्या
भाजपकडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी, असे खुले आव्हानही त्यांनी भाजपला दिले. उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही.
ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे की, भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा. तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकऱ्यांना दिले का? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे.
शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निवडून येतात. पवार हे शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना झापले.
आम्ही सत्तेत आल्यानंतर जशी कर्जमाफी दिली, तशी यांनी दिली नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भाजप नुसते राजकारण करत आहे, असा चिमटा देखील त्यांनी काढला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आज दुपारी अखिल भारतीय वारकरी मंडळाने खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा आयोजित केला होता. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पेन्शनमध्ये गेलेल्यांचे टेन्शन नको
भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री आहेत असं सांगतानाच सरकारच्या तिजोरीत खणखणाट असताना ते शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? असा सवालही राणे यांनी केला होता. त्यावर ‘जे पेन्शनमध्ये गेले, त्यांचे काय टेन्शन घ्यायचे’, अशा शब्दात पाटील यांनी राणेंची खिल्ली उडवली.
Read Also :
राजकीय कर्तृत्त्वाची भाजप नोंद घेत नसल्याची खंत खडसेंना वाटत असेल : शरद पवारhttps://t.co/UsUt9toSVc @PawarSpeaks @EknathKhadseBJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020