सोलापूर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी करत सरकारने जबाबदारी झटकू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही.
मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं
“पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फोन केला. त्यामुळे आमची खात्री पटली जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
Read Also :
अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाखांची मदत https://t.co/TeHeSvy1IX #MaharashtraRains #MaharashtraFlood @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020