जळगाव: सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. या अत्याचारी मोदी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. २०२४ मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर भाजपावर सडकून टीका केली.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या होम ग्राऊंडवर नाना पटोले यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार बॅटिंग केली. भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी काँग्रेस शिवाय होऊच शकत नाही. काँग्रेस पक्ष हा युपीएचे हृदय आहे. जर कोणताही विरोधी पक्ष तिसरा मोर्चा काढायला गेला तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल, हे आता सर्वांना कळलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून अशी तिसरी आघाडी होणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात ४०० शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत नाना पटोेले यांनी मोदींवर टीका केली आहे.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप जबाबदार – नाना पटोले
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. २०१७ मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले तसेच आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल.