दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाच्या प्रश्नी मनसे अध्यक्ष यांनी आज राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. असे स्वतः राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. ‘लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो’, असं राज यांनी स्पष्ट केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी राज्यपालांशी संवाद साधला. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे’, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.
या सर्व चर्चेनंतर राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत ‘एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे’, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020