कोल्हापूर – शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवरून भाजपवर केलेल्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. काहीही घडलं तरी भाजपवर टीका केली जाते.
ईडीचा भाजपशी संबंध लावला जातो, असं सांगतानाच राऊत आणि विरोधकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना मान्य नाही बहुधा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे. ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा भाजपशी संबंध जोडणं असंमजसपणाचे लक्षण आहे, असं सांगतानाच 100 काय राऊत यांनी 240 जणांची यादी ईडीला द्यावी आणि कारवाईसाठी पाठपुरावाही करावा, असा चिमटा पाटील यांनी राऊत यांना काढला.
ईडी अचानक कारवाई करत नाही. त्यामुळे भाजपच्या नावाने शंख करण्याची गरज काय? असा सवाल करतानाच काही केले नसेल तर घाबरता का? काही तरी असेल म्हणूनच घाबरता ना? असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा दुरुपयोग सुरू आहे. राऊत किंवा विरोधकांना आंबेडकरांनी लिहिललेी घटना मान्य नसल्याचं दिसतंय, असं सांगतनाच कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी आम्ही विचलीत होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.