मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याचा नवीन जीआर काढून जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना गुलाल लावून विजयाचा गुलाल देखील आज वाशीत उथळला. त्यामुळे मराठा समाजाकडून यांचं जोरदार स्वागत आणि मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला. तर आम्ही याचा कायम विरोध केला असून पुढेही करत राहू, वेळ पडली तर कोर्टात देखील जाऊ असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
आमची नाराजी सगळ्यांसमोर बोलून दाखवली आहे. अजून कोणीतरी लाखो लोकं घेऊन येतील मग आपण कायदे बदलणार का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच याबाबत सगळ्याच मराठा समाजातील नेत्यांनी देखील विचार केला पाहिजे. आपण आरक्षणाच्या बाबत ५० टक्क्यांसाठी समुद्रात लढत होतो. त्याचा आपण विचार केला पाहिजे. असेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे. तो सर्व समाजाच्या आरक्षणासाठी घातक आहेत. सरसकट गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर देखील छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. घरं जाळली, पोलिसांवर हल्ला केला. त्यांचे गुन्हे मागे घेत असतील तर उद्या सगळ्यांसाठी हा नियम लागू होईल. आंदोलन म्हणून असं उद्या कुणीही अशा पद्धतीचं केलं तर ते होणार नाही. असेही भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाला १०० टक्के शिक्षण मोफत द्या. या मागणीवर देखील भुजबळांनी हल्लाबोल केला. सर्व ओबीसी, दलित आदिवासी, ओपन या सगळ्यांचं मोफत शिक्षण द्या. यातून ब्राम्हण समाजाला देखील द्या ना मग. असंही ते म्हणाले. या सर्व संदर्भात माझ्या सिद्धगड बंगला या निवासस्थानी यावर चर्चा करणार आहोत. या बैठकीसाठी कुठलेही नेते, कार्यकर्ते येऊ शकतात. केवळ ओबीसी या विषयावर तसेच या सगळ्या विषयावर पुढे काय रणनिती आखली जाईल. यासंदर्भात आम्ही चर्चा करून एकत्रित बसून निर्णय घेऊ. कोर्टात ज्यावेळी हरकती देऊ. त्यानंतर देखील काही झालं तर बघू. हा एक फक्त मसुदा असून हा अध्यादेश नसून फक्त एक अध्यादेश आहे. हा अध्यादेशवावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याचा अधिकार आहे. ते ठरलं तर मग कोर्टात जाता येईल. असेही भुजबळांनी सांगितले.
दरम्यान, जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर कूच करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर राज्य सरकारची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. या बैठकीत जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीत येऊन सरकारचा नवीन जीआर जरांगे पाटलांच्या हाती दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी जो गुलाल उधळला आहे. त्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान होऊ देऊ नका. नवा जीआर आता कायम राहू द्या.सगेसोयरे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश महत्वाचा होता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल त्यांचे आभार. साडेचार महिन्यांपासून संघर्षण सुरू आहे. आरक्षणासाठी 300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर सुरू, 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. परंतु पुढे आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन. या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी सगल्यात पहिले मुंबईला, आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा. असा इशारा देखील दिला आहे.