सांगली : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या प्रचंढ वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे.
मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.
आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, अश माहिती त्यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन देखील नागरिकांना जयंत पाटलांनी केले.