मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा प्रश्न उपस्थित केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील ठाकरे शैलीत सडेतोड उत्तर दिले. या पत्र प्रकरणावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपले मत मांडले आहे. राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणे हे न कळण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळं उघडायला सरकारने अनुमती दिलेली नाही. मा. राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2020
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले की, कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळं उघडायला सरकारने अनुमती दिलेली नाही. मा. राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही.
दरम्यान, मंदिरे खुली करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात? यावर उत्तर देताना ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’, उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.