मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. दोन्हींकडून आकडेवारी मांडून एकमेकांना प्रत्युत्तर दिले जात आहे. महाराष्ट्रात लसींअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिकपणे केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे.
उत्तर प्रदेशप्रमाणेच रेबीजच्या लसी टोचून टाका, असे उपरोधिक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून इतर राज्यांचे दाखले देत महाराष्ट्र सरकारला प्रत्युत्तर देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे.
आमचे टोपे साहेब लोकांच्या आरोग्याबाबत फारच हळवे होतात. उत्तर प्रदेशसारख्या द्यायच्या रेबीजच्या लसी टोचून.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमचे टोपे साहेब लोकांच्या आरोग्याबाबत फारच हळवे होतात. उत्तर प्रदेशसारख्या द्यायच्या रेबीजच्या लसी टोचून, असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना लसीच्या ऐवजी तीन महिलांना रेबीजची लस देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता कारवाई करत फार्मासिस्टला निलंबित करण्यात आले आहे.