ठाणे : ठाकरे सरकार लवकरच कोसळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. एका खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याचे संकेत दिले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नव्हे’, असा टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या. तेव्हा महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाही, याची काळजी घ्या, असे टीकास्त्र देखील आव्हाडांनी अमित शाहांवर सोडले.
दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ठाकरे सरकार त्यांच्या कर्माने कोसळेल. आम्हाला काहीही करावे लागणार नाही, असे म्हटले होते.